“रस्ता खराब, ठिकठिकाणी डागडुजी; टोलवसुली मात्र सुरूच – सुविधा कुठे”?
महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
परभणी-मानवत- पाथरी हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याची डागडुजी करण्यात आली असली तरी रस्त्याची एकूण स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
परभणी-मानवत मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी केलेली डागडुजीही निकृष्ट अथवा अपुरी असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
दरम्यान, रस्त्याची अवस्था खराब असतानाही या महामार्गावरील टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांकडून टोलच्या माध्यमातून शुल्क आकारले जात असताना त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.
टोल नाक्यावरही सुविधांचा अभाव
टोलवसुली केली जात असताना वाहनधारकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गाची दुरुस्ती, खड्ड्यांची कायमस्वरूपी डागडुजी, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन मदतीसारख्या सुविधांकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का?
परभणी-मानवत महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच मानवत परिसरात महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता महामार्गाची तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.
टोलवसुली सुरू असताना महामार्गाची सुरक्षितता आणि वाहनधारकांना आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
